जळगाव । सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे तालुक्यातील भादली येथील ५७ वर्षीय शेतकऱ्यांने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. प्रभाकर पांडूरंग कोळी (वय-५७) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रभाकर कोळी यांचे भादली शेत शिवारात शेत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. तश्याच त्यांनी उडीदाची कापणी केली. मात्र, ती देखील पावसामुळे पुर्णपणे नुकसान झाले. यामुळे काही दिवसांपासून प्रभाकर कोळी चिंतेत होते. दरम्यान, आज घरी कोणीही नसतांना दुपारी राहत्या घरात दोरीने गळफास घेवून प्रभाकर कोळी यांनी जीवन संपवले.
सायंकाळी पत्नी व मुलगा घरी आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने खाली उरवून जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.