पाचोरा,दि. 1-
पाचोरा तालुक्यातील रेशनिंग दुकानदार संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, शहर अध्यक्ष सलीम रंगरेज, तालुका सचिव सचिन येवले सह संघटनेचे पदाधिकारी व रेशनिंग दुकानदार उपस्थित होते.
या आहेत मागण्या-
माहे सप्टेंबर 2018 चे चलन भरण्यास दुकानदार तहसिल कार्यालय येथे दुकानदारांनी संबंधित अधिकारी वर्गास आले असता या महिन्यात मालाचे प्रमाण कमी असल्याने दुकानदारास धान्य वाटप करणे शक्य नाही. तोंडी विचारले असता ऑफलाईन वाटपातुन 30 टक्के माल कपात केलेला आहे. असे न सांगता माल वाटपासंदर्भात आपल्या स्तरावरुन लेखी कळवावे, जळगांव जिल्हयात कुठेही तहसिलदार यांनी पाचोरा तहसिल कार्यालयाप्रमाणे माल कपात केलेला नाही, आपल्या स्तरावरुन असे सांगण्यात येते की, ग्राहकांना धान्यापासुन वंचित ठेवता येवु नये. इतका माल कमी मिळाल्यास आम्हास धान्य वाटप करणे शक्य नाही. तरी धान्य वाटपासंदर्भात योग्य ती लेखी सुचना मिळेपर्यंत धान्याचे वितरण करणे शक्य नाही, महाराष्ट्र शासनाकडून धान्य कमी करण्यासंदर्भात लेखी पत्र आले असेल तर रेशन संघटनेस न्यायालयीन कामकाजासाठी प्रत मिळावी, धान्य वितरित करीत असतांना काही ग्राहकांचे अंगठे, थम्ब किंवा आधार नंबर चुकीचे असल्याने पॉस मशिन मधुन पावती निघत नाही. अशा व्यक्तिंना रास्तभाव दुकानदार धान्यापासून वंचित ठेवु शकत नसल्याने धान्य देणे गरजेचे आहे. व ते दिलेही जाते. दुकानदार डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे समक्ष काम केले असल्याने सुध्दा किमान 3 ते 4 महिने ऑनलाईन दुरुस्ती होत नाही. सदर लाभार्थ्यांना धान्य कसे वितरित करावे, अन्न सुरक्षा ही योजना सुरू असतांना केंद्र शासनाचे पत्रात नमूद केले आहे की, कुठल्याही ग्राहकाला धान्यापासून वंचित ठेवु नये. आपल्या स्तरावरुन अशाप्रकारे धान्यात कपात झाल्यास (दुकानदारास कमी धान्य मिळाल्यास) सदर ग्राहक धान्यापासून वंचित राहतील. अशा मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. निवेदनावर मनिषा पाटील, संजय पाटील, राजमल राठोड, राजेंद्र पाटील, शरद पाटील, सुरेखा महाले, आनंदा पाटील, आदिलखान पठाण, राजेंद्र वाघ, शिवचंद राठी, एस.एन. सोनार सह दुकानदारांच्या सह्या आहेत. तसेच निवेदनाच्या प्रकरणी आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना देण्यात आले आहे.