जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला असून तो 14 एप्रिल रोजी संपणार आहे. पण कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यात “लॉकडाउन’ कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, या वाढीव मुदतीतही प्रशासकीय नियमांचे जिल्हावासियांनी तंतोतंत पालन करावेच असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात काही अपवाद वगळता जिल्ह्यातील जनतेने अतिशय संयमाने लॉकडाउनचे पालन केले आहे. पुढील दिवसांमध्येही याच प्रकारे नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला “तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो’ असे आश्वस्त केले आहे. याच प्रकारे जिल्ह्यातील जनतेची काळजी घेण्यासाठी माझ्यासह जिल्हा प्रशासन बांधील आहे. या कालावधीत आपली होणारी गैरसोय ही कमीत कमी कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वांनी नियमांचे पालन केल्यास आपल्याला त्रास होणार नसल्याची ग्वाही आम्ही देत आहोत, असं ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
गरजूंना मदतीचा हात
लॉकडाउनच्या वाढीव कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईलच असे त्यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील गरजूंना प्रशासनासह खासगी संस्थात्मक पातळीवर योग्य नियोजन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या वाढीव कालावधीतही जिल्ह्यातील गरजूंना मदत केली जाणार असून पूर्वीप्रमाणेच शेतकरी हित जोपासले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.