आजी माजी आमदारांसह उद्योजक तसेच महिला देखील इच्छुक
फैजपूर (प्रतिनिधी): रावेर यावल मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची चांगलीच भाऊगर्दी रंगलेली असतांनाच मतदार विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे,माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यापैकी कोणाला संधी देणार की नविन चेहरा मैदानात उतरणार? याविषयी अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे,उद्योजक श्रीराम पाटील, नारीशक्ती गृप च्या सौ.दिपाली चौधरी झोपे,डॉ.कुंदन फेगडे,यांच्यासह जवळपास १५ इच्छुकांनी भारतीय जनता पक्षाचे इच्छुक अर्ज भरले आहेत.त्यापैकी आठ ते नऊ इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे.त्यातच विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे,नारीशक्ती च्या सौ.दिपाली चौधरी व उद्योजक श्रीराम पाटील यांचेच नावे आघाडीवर आहेत. तसेच कॉंग्रेस तर्फे माजी आमदार शिरीष चौधरी,मा.शरद जिवराम महाजन यांच्यासह एकुण चार जणांनी उमेदवारी साठी अर्ज केलेला असून सध्यातरी माजी आमदार शिरीष चौधरी यांचे एकमेव नाव चर्चेत आहे मा.आमदार शिरीष चौधरी यांनी मतदारसंघात बुथ मेळावे,कार्यकर्ते मेळावे यांमाध्यमातून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते.अपक्ष म्हणून भुसावळ चे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनीदेखील जोरदार तयारी सुरू केली असून त्यांच्यासोबत माजी आमदार संतोष चौधरी हे देखील रावेर मतदारसंघात अनिल चौधरी यांच्या प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसून येते.एम आय एम कडून मुस्लीम उमेदवार मिळावा अशी मागणी मुस्लीम मतदारांनी पक्षाकडे केली असुन बामणोद येथील रहिवासी व पुणे येथील उद्योजक हाजी सैय्यद मुश्ताक कमरुद्दीन सैय्यद यांनी एम आय एम कडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून तेदेखील मोठं आव्हान उभं करु शकतात.रावेर यावल मतदारसंघात नवीन चेहर्याला संधी मिळणार असल्याचे बर्याच दिवसांपासून बोलले जात होते.त्यातच रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील व सौ.दिपाली चौधरी यांच्या नावाने विविध चर्चांना उधाण आलं आहे.इच्छुकांमध्ये सौ.दिपाली चौधरी यांनी अर्ज दिल्याने पहिल्यांदाच उच्चशिक्षित व तरुण महिलेचे नाव आल्याने महिला वर्गात सकारात्मक चर्चा होताना दिसत असून सौ.चौधरी यांनीदेखील गावपातळीवर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत संपर्क अभियान सुरू केले आहे.विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे यांची पक्षाने कृषी संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केल्याने त्यांना मंत्रीपदाचा दर्जा मिळाला असून रावेर मतदारसंघात त्यांच्या जागी भाजपातर्फे नविन व युवा चेहर्राचा शोध घेतला जात असल्याचे देखील बोलले जात आहे तर एकीकडे पक्षाने त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देऊन अजून मजबूत केले असल्याने त्यांनाच भाजप उमेदवारी देईल अशीही चर्चा सुरू आहे.
मोठे निर्णय
पाडळसे प्रकल्प,मेगा रिचार्ज प्रकल्पाला मिळालेली प्रशासकीय मान्यता,थेंब अमृताचा अभियानाच्या माध्यमातून संत महंत व जनतेच्या सहकार्याने जलसंधारणाचे काम बर्यापैकी यशस्वी झाले आहे.हि विद्यमान आमदारांच्या जमेची बाजू आहे.
समस्या
मधुकर सहकारी साखर कारखाना डबघाईस आला असून,अजूनतरी नविन मोठे उद्योग मतदारसंघात आलेले नाहीत.त्याचप्रमाणे रस्त्यांचे देखील बरेचसे प्रश्न असून रोजगाराची समस्या जास्त बिकट होत आहे.