‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही ; शिवसेनेची भाजपवर टीका

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्यातील भाषणावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेनेनं सामनामधून प्रत्युत्तर दिलं आहे. मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते थाळ्या बडवत आहेत आणि छाती बडवत आहेत त्यांनी हिंदुत्वाचे धडे सरसंघचालकांकडून घ्यायला हवेत, असा टोला भाजपला शिवसेनेने लगावला आहे.

 

थाळ्या, घंटा बडवण्यापुरते हिंदुत्व हे नाही तसेच ते दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. दाढी चापेकर बंधूंना नव्हतीच, पण तीनही चापेकर बंधू हसत हसत देशासाठी फासावर गेले. अशा मर्दानगीची अनेक उदाहरणे आहेत. हिंदुत्वाला आणि राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच सरसंघचालक आणि शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे होती. दसऱ्याच्या निमित्ताने नागपुरात आणि मुंबईतील वीर सावरकर स्मारक सभागृहात हिंदुत्वावर मंथन झाले. दोन्ही नेत्यांचे अभिनंदन!,’ असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

 

दोन मेळावे दसऱ्याच्या निमित्ताने गाजले. पहिला नागपूरचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक विजयादशमी मेळावा, दुसरा अर्थातच मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा. दोन्ही मेळावे कोरोनामुळे बंद सभागृहांत झाले, पण मेळाव्यांच्या प्रमुख सूत्रधारांनी मांडलेले हिंदुत्वाबाबतचे विचार देशभर पोहोचले आहेत. दोन्ही व्यासपीठांवरील भाषणे म्हणजे सडेतोड तोफखानेच ठरले! दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करून सांगितली आहे. हिंदुत्वाचा संघाच्या दृष्टिकोनातून अर्थ व्यापक असून पूजा पद्धतीशी जोडून त्याला संपुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी, जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विपृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले असतानाच सरसंघचालकांनी त्या ठेकेदारांचे दात घशात घातल्याचा टोलाही शिवसेनेने लगावला.

 

संघाची काळी टोपी घालून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचे धडे देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी करून पाहिला. महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार की नाही? तुम्ही हिंदुत्व सोडले आहे काय? तुम्ही सेक्युलर झालात काय? असे प्रश्न मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी विचारले. उद्धव ठाकरे यांनी त्यास खणखणीत उत्तर दिलेच, पण आता सरसंघचालकांनीही यावर खडे बोल सुनावले आहेत.

 

‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच का तुमचे हिंदुत्व? असा टोकदार भालाच उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुपसला. गाई भाजपशासित अनेक राज्यांत कापल्या जातात आणि खाल्ल्या जातात हे वास्तव असल्यामुळे भाजपचे गाईचे हिंदुत्व तकलादू आहे. त्या तकलादू भूमिकेची चिरफाड करत उद्धव ठाकरे यांनी लक्तरे वेशीवर टांगली आहेत. भाजपची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था असल्यामुळे सरसंघचालक काय सांगतात ते अनेकदा दिशादर्शक ठरते. संघाचा हिंदू विचार कधीच लपून राहिला नाही. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले, त्या सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अयोध्येत राममंदिर व्हावे ही संघाची भूमिका होतीच, पण ‘कोरोना’ महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे भागवत कधीच सांगणार नाहीत, असेही सामनातून म्हटले आहे.

 

सरसंघचालक मंदिरांत गर्दी झाली तर महामारीचे संकट वाढेल असा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणाऱ्यांपैकी आहेत. कोरोना घंटा बडवून, थाळ्या वाजवून पळून जाणार नाही. आरोग्यविषयक कठोर नियम-शिस्तीचे त्यासाठी पालन करावेच लागेल, लसीवर संशोधन करावेच लागेल असे मानणारे सरसंघचालक आहेत. मंदिरासाठी भारतीय जनता पक्षाचे जे लोक थाळ्या बडवत आहेत व छाती बडवत आहेत त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.