डॉक्टर पतीने विषारी इंजेक्शन टोचल्याचा नातेवाईकांचा आरोप
जामनेर / जळगाव दि. 14
जामनेर येथील रहिवासी जळगाव येथे सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या राखी उर्फ विद्या भरत पाटील (वय 37) यांचा काल संशयास्पद मृत्यू झाला असून मयत राखीचे पती डॉ. भरत पाटील यांनी विषारी इंजेक्शन टोचल्याने तिचा मृत्यू जाला असल्याचा आरोप मयत राखीच्या नातेवाईकांनी केला असल्याने खळबळ उडाली आहे.
काल रविवारी राखीचा अंत्यविधी न करता आज जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात तिच्या मृतदेहाचा इन कॅमेरा उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर सरकारी वकील राखीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार जामनेर पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. त्यात मयत राखीचे पती डॉ. भरत पाटील यांना आरोपी करण्यात आले आहे.
जळगाव कोर्टात सरकारी वकिल असलेल्या राखी उर्फ विद्या भरत पाटील या जामनेर येथे सुपारी बागेच्या मागे राहात होत्या. त्यांचे पती डॉ. भरत पाटील यांचे जामनेरात येथे क्लिनीक आहे. डॉक्टर भरत पाटील यांचे विवाह बाह्य संबंध असून पती- पत्नीमध्ये वाद असल्याचे सांगण्यात येते. दोघांना पुर्वेश आणि सोनू अशी दोन मुले आहेत.
विषारी इंजेक्शन टोचून पतीने केली हत्या- नातेवाईक
डॉ.भरत पाटील यांनीच पत्नी राखी पाटील यांची विषारी इंजेक्शन टोचून हत्या केल्याचा आरोपी नातेवाईकांनी केला आहे.
नातेवाईकांनी सांगितले की, भरत पाटील यांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास फोन करून राखीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मृत्यूचे कारण विचारले असता इलेक्ट्रीक शॉक लागल्याचे सांगितले. त्यानंतर पतीने राखीचा मृतदेह त्याचे मूळगाव बेलखेड (ता. भुसावळ) मृतदेह नेला. मात्र, पोस्ट मार्टम झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. नंतर मृतदेह वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. परंतु प्रकरण गंभीर असल्याचे सांगत राखी यांचा मृतदेह जळगाव येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला.
पैशाची वारंवार करत होता मागणी..
डॉ. भरत पाटील याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशंय राखी यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केले आहेत. डॉक्टरी व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, म्हणून भरत पाटील हा पत्नीकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. गेल्या आठवड्यात राखी यांनी पतीला 58 हजार रुपये दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले.