मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सकाळी दहा वाजताच्या सुमारास लागले. सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसत असून काही भागात कंकणाकृती, तर महाराष्ट्रासह काही भागात ते खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी आणि सर्वात लहान रात्री ही खगोलीय घटना घडणार आहे.
या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे जेथे महाभारत युद्ध झाले त्या कुरुक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
रविवारी सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झाला. दुपारी 12 वाजून 01 मिनिटांपासून 12 वाजून 02 मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. तर दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.