चोपडा(प्रतिनिधी) : दिवसेंदिवस महागाईचा भस्मासुर वाढत चालल्याने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. देशभरातील भाजपविरोधी पक्ष व सर्वच सामाजिक, राजकीय संस्था, संघटनांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या वाढत्या महागाईचा निषेध करून महागाई कमी करण्यासाठी प्रशासनाला निवेदने सादर करीत आहेत. आपणही या देशाचे घटक आहोत व आपणही या महागाईच्या भस्मासुरात पोळून निघत आहोत.
केंद्राकडुन पेट्रोल,डिझेल,गॅस व रासायनिक खतांच्या किंमती वाढविल्याचे जनमाणसांत बोलले जात आहे.तसेच राज्याकडुन सुध्दा वाढिव विजबिले,जिवनावश्यक वस्तुतील खाद्यतेलांच्या किंमती वाढविल्या जात आहेत.केंद्रात आपली भाजपाची जरी सत्ता असेल तरी आपणही या बाबतीत आपापल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचेशी साधक-बाधक चर्चा करू शकतो.सत्ता आपली असतांना मौन धारण करावेच लागते पण सार्वजनिक अन्याय होत असतांना बोलावेच लागते.म्हणुनच आपल्या भाजपाचे लोकप्रतिनिधी,आमदार, खासदार,मंत्रीमहोदयांना सांगून महागाईला आळा बसावा यासाठी आपणही सत्तेत राहुन प्रयत्न करू शकतो,अशी स्पष्टोक्ती चोपडा भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व विधानसभा क्षेत्रप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
सध्या पेट्रोल, डिझेल, गॅस, रासायनिक खते, जीवनावश्यक वस्तू,खाद्यतेल यांच्या किमती भरमसाठ वाढत असून शेतीमालाची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. या महागाईमुळे शेतकरी,शेतमजूर, मध्यमवर्गीय नोकरदार, किरकोळ उद्योग व्यावसायीक, कामगार यांना आर्थिक ताण येत आहे. कोरोना लॉकडाऊन काळात सर्वच उद्योगधंदे, व्यवसाय बंद होते. शेतीमालाला उठाव नव्हता यामुळे महागाई वाढतच आहे.अशा वेळी सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे मुश्कील झालेले आहे. कोरोनाच्या आजाराने दवाखाने भरून होते तर रुग्णांच्या उपचारामुळे नातेवाईकांचे खिसे खाली झालेले आहेत.
म्हणून या महागाईला आळा बसावा यासाठी आपण भाजपवाल्यांनी सुध्दा प्रयत्न करावा,तसेच माझ्या ह्या स्पष्टोक्तीचा पक्षाने विपर्यास करू नये.कारण सत्तेत असतांना काही निर्णय चुकत असतील तर त्या सत्तेतील किंवा पक्षातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारांसाठी व सामान्य जनतेच्या न्याय्यहक्कांसाठी बोललेच पाहिजे.हि सर्वांसाठीचीच आंतरीक भावना अाहे,असेही मत गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे.