मनूर येथे होम क्वारंटाईन व्यक्तींशी व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद

0
बोदवड, प्रतिनिधी – तालुक्यातील मनूर बुद्रुक् येथे मुंबई परिसरातून चार पाच दिवसांपूर्वी घरी परतलेले दोन व्यक्तींचे हातावर घरी विलगीकरण पाळण्याची खूण म्हणून शिक्के मारले आहेत.या मुळे गावात थोडी खळबळ उडाली होती.मात्र त्यांची नोंद घेऊन त्यांना त्यांचे घरातीलच स्वतंत्र खोलीत विलग ठेवण्यास सांगितले गेले.आणि त्यांचे घर व आसपासचा परिसर सोडियम हायोक्लोराईड च्या द्रावणाने फवारणी करून घेतला तसेच हे द्रावण त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्यात आले असून त्यांनी आपल्या घराचे जवळ रोज फवारण्याचे नियोजन करून देण्यात आले आहे.विलग ठेवलेल्या व्यक्तींनी दिवसभरातून वेळोवेळी सेल्फी काढून व्हाट्स अप च्या माध्यमातून पाठवण्याचे सूचना ग्रामस्तरीय समितीचे प्रभारी अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिल्या आहेत व त्याचे पालन केले जात आहे तसेच स्वतःमहेंद्र पाटील व्हिडीओ कॉल करून या लोकांची दिवसभरातून दोन तीन वेळा चौकशी करून त्यांना धीर देत आहेत.काल दि.३१ रोजी बोदवड तहसीलदार रवींद्र जोगी,बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले,पोलीस निरीक्षक सुनील खरे यांनी मनूर येथे सायंकाळी भेट दिली असता,आरोग्य उपकेंद्रात बसून महेंद्र पाटील यांनी या व्यक्तींचे या सर्व अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉल वर बोलणे करून दिले या सर्वांनी या लोकांना काळजीपूर्वक चौकशी केली.कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता ग्रामपंचायत मनूर ने १६ मार्च रोजी तातडीची बैठक घेऊन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून त्यात सरपंच,उपसरपंच,सदस्य,आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामरोजगार सेवक व स्वयंसेवक यांचा समावेश करण्यात आला.आणि १७ तारखेपासून मोठ्या शहरातून तसेच दुसऱ्या राज्यातून घरी परतलेल्या नागरिकांची नोंद घेतली.गावात अनुक्रमे फिनाईल आणि सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाची फवारणी करण्यास सुरुवात केली सार्वजनिक बसण्याची ठिकाणे,घरांचे ओटे,पायऱ्या,दरवाजे,फाटके, मंदिरे,या सारख्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाची फवारणी करण्यात आली.तसेच ग्रामरोजगार सेवक व काही वॉर्डमधील तरुणांच्या मदतीने टप्या टप्याने फवारणी करणे सुरू आहे.तसेच सोबत डास व माश्या यांच्या मुळे दुसरे आजार उदभवू नये म्हणून गटारींवर औषध फवारण्यात येणार आहेत असे पाटील यांनी सांगितले.
 गावातील सर्व दुकानांना,बाहेरून येणारे विक्रेते यांना आचारसंहिता लागू केली असून त्याचे पालन स्वयंस्फूर्तीने केले जात आहे.सुरक्षित अंतर ठेवून परस्परांचे संवाद करण्यास अनेक नागरिकांनी सुरवात केली असून जास्तीत जास्त लोक घरी बसण्यास प्राधान्य देत आहेत.कोणतीही कठोर उपाययोजना टाळत सर्वांशी संवाद साधत लॉक डाऊन व सुरक्षित अंतर व्यवहार करावा यावर समिती द्वारे प्रबोधन करण्यात येत आहे.आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका यांचे कडून गावात कोणी आजारी आहे का याची दररोज चौकशी केली जात आहे.सरपंच नर्मदाबाई ढोले,उपसरपंच राजेंद्र शेळके सर्व ग्रामपंचायत सदस्य परस्पर संपर्कात राहून नियोजनास सहकार्य करत असल्याचे समिती अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.