जनजीवन विस्कळीत ; सर्वत्र घाणीचे साम्राज्य
भुसावळ (प्रतिनिधी) : शहर व तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून आज बुधवार रोजी पहाटे पासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे हतनूर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे तापीनदी दुथडी भरून वाहत आहे.
बुधवार १५ जुलै रोजी पहाटेपासून अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले सफाई न झाल्याने पहिल्याच पावसाने नाले तुडुंब भरून वाहू लागले. १३ तारखेला ७ दिवसांचा कडक लॉक डाऊन हटवला १४ रोजी सर्वानी खुश होऊन दुकाने उघडली मात्र आज जणु पावसाने लॉक डाऊन जाहिर केला दिवसभर पाऊस असल्याने बाजारपेठेवर परिणाम होऊन जनजिवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांत दडी मारलेल्या पावसाने दमदार हजेरी देवून सर्वाना सुखद दिलासा दिला.हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैरान झालेल्यांना दिलासा मिळाला. शहरातील रजा टॉवर खडका रोड भागातील नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहत असून अनेक नाल्याकाठी असलेल्या घरात पाणी घुसण्याची शक्यता असल्याने येथील घराना धोका उद्भवू शकतो. सकाळपासून दुपारपर्यंत संततधार पाऊस सुरू होता . पावसामुळे बाजारपेठसह जनजीवन विस्कळीत झाले होते या पावसामुळे शहरातील अनेक गटारी तुडुंब भरल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते तर काही ठिकाणी वाहन धारकांना पाण्यातून वाहन काढतांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या दमदार पावसामुळे शेतकरी बांधव सुखावला असून आशा पल्लवित झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.