पारोळा : पारोळा तालुक्यातील भिलाली येथील सन २०१४ पासून मंजूर असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याचे काम अपूर्ण आहे. काम मुदतीत पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
भिलाली बंधाऱ्याचे 80 टक्के काम झाले आहे. उर्वरित २०टक्के काम सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावी बंद पडले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास पाणी अडविणे शक्य नाही. यासाठी लवकर सुधारीत मान्यता मिळावी, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे. बंधाऱ्याची मूळ प्रशासकीय मान्यता ३ कोटी २६लाख ४५ हजार रुपये होती. बंधाऱ्याची जलक्षमता १. १६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. कामाची मुदत १८महिन्यांची होती. सद्यःस्थितीत ८० टक्के काम झाले आहे. २०१८अखेर ३ कोटी२१ लाख ४० हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे.
सुधारीत मान्यता १० कोटी ७९ लाख ८८ हजार रुपये इतकी आहे. मात्र, हे काम फक्त २० टक्केच शिल्लक असून, मान्यतेअभावी बंद पडले आहे. यास तत्काळ मंजुरी मिळण्याची गरज असून, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. उपोषणास सरपंच अनिता पवार, उपसरपंच दीपक पाटील, शिवाजी पाटील, विश्वास पाटील, डॉ. पांडुरंग पाटील, निंबा पाटील, दत्तू पाटील, शरद पाटील, सतीश पाटील, नंदू पाटील, गोरख पाटील आदींसह दोनशे ग्रामस्थांचा समावेश आहे.