पाचोऱ्यात संतप्त रेल्वे प्रवाशांचा रेल रोको

0

पाचोरा :- मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालेले असतांनाच मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला असून पाचोरा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी सुमारे दीड तास भर रेल्वे रोखून धरल्याने गोंधळ निर्माण झाला होता. गोरखपूर हुन लोकमान्य टिळक जाणारी ०१०२४ अप एक्सप्रेस ही उन्हाळी विशेष गाडी (हॉलीडे) पाचोरा रेल्वे स्थानकात सकाळी सुमारे ४ वाजल्यापासून थांबवून ठेवण्यात आल्याने प्रवाशी संतप्त झाले होते. अखेर सकाळी प्रवाश्यांच्या आंदोलनाची दखल घेत सकाळी १०.३० च्या सुमारास या गाडीस नासिकपर्यंत रवाना करण्यात येत असल्याचे जाहीर झाल्याने प्रवाश्यांनी आंदोलन मागे घेतले आणि रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.

गोरखपूर येथून दि.१ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास निघालेली गोरखपूर -लोकमान्य टिळक विशेष उन्हाळी गाडी ही पहाटे ४ वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली.मात्र सकाळी ९ वाजले तरी गाडी पुढे रवाना होत नसल्याने प्रवाशी आक्रमक झाले त्यातच संपूर्ण वातानुकूलित गाडीचे ए.सी.बंद करून ठेवण्यात आल्याने प्रवाशी हैराण झाले होते. त्यातच आता ही गाडी येथेच रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर झाल्याने प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून  रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत रेल रोको आंदोलनास सुरुवात केली यावेळी पाचोरा स्थानकात अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक राखून धरण्यात आली होती. यात डाउन मार्गावरील माल वाहतूक गाडी तर अप मार्गावरील जम्मूतावी -पुणे झेलम एक्सप्रेस गाड्या त्यांनी थांबवून धरल्या. दुसरीकडे स्थानिक स्टेशन मास्तर सुधाकर जाधव यांनी सातत्याने मुख्यालयाशी संपर्क साधत त्यांना घटनेची माहिती देत गाडी पुढे मार्गस्थ करण्याची विनंती केली.अखेर सकाळी १०.३० च्या सुमारास भुसावळ रेल्वे प्रशासनाने गोरखपूर – लोकमान्य टिळक विशेष गाडी पुढे नासिक पर्यंत जाणार असल्याचे जाहीर केल्याने जाहीर केल्याने प्रवाश्यांनी आंदोलन मागे घेतले त्यानुसार गाडी मार्गस्थ झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Leave A Reply

Your email address will not be published.