४ वर्षात दोन हजार हेक्टर सिंचनात वाढ
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यात राज्य शासनाच्या कृषी विभागासह जिल्हा परिषदेच्या सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभागामार्फत गेल्या चार वर्षांत ५३ गावातील शेत शिवारात जल संधारणाची कामे करून पावसाळ्यात शेतात पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब शेतातच अडवुन भुगर्भ पातळीत जल साठ्यात वाढ करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. यावर सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी जल संधारण विभागाने तालुक्यातील २२ गावांचा नव्याने समावेश केला आहे.
राज्य शासनाच्या जल संधारण विभागामार्फत सन २०१४-१५ पासुन जलयुक्त शिवार अभियान योजना हाती घेतल्या नंतर यात प्रामुख्याने कृषी विभागासह जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कडुन नाला खोलीकरण, समतल चर, सिमेंट बांध, माती बांध, बंधाऱ्यांची दुरूस्ती, पाझर तलावांची दुरुस्ती, विहीरींचे पुनर्भरण यासारखी जल संधारणांची कामे हाती घेवुन तात्कालिन उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, कृषी विभागाचे उप विभागीय अधिकारी नारायणराव देशमुख, तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकुर यांनी पावसाळ्यात वाहुन जाणारे पाणी जमिनीतच अडवून भुगर्भ पातळीतील जल साठ्यात वाढ करण्याच्या दृष्टीने योजना हाती घेवुन सन २०१४-१५ व २०१५-१६ या आर्थिक वर्षात तालुक्यातील १७ गावांचा समावेश करून या गावातील शेत शिवारात ८ कोटी ४२ लाख रुपये खर्च करून ८६१ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार अभियानात २० गावांचा समावेश करून ५ कोटी ५० लाख रुपये खर्च करून ३७६ कामे केल्याने ११२८ हेक्टर संरक्षित सिंचनात वाढ झाली. सन २०१७-१८ मध्ये १६ गावांचा समावेश करून यात केवळ कृषी विभागाने ६५ लाख रुपये खर्च करून १८५ कामे पूर्ण केली.
या गावांचा झाला नव्याने समावेश – सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार अभियान योजनेत वाडी, सारोळा खु”, वाघुलखेडा, चिंचपुरे, लोहारी बु”, लासुरे, गाळण खु”, जामने, गोराळखेडा बु”, अटलगव्हान, गोराडखेडा खु”, वडगांव खु” प्र.भ., नांद्रा, खाजोळा, खडकदेवळा खु”, आर्वै, डोंगरगाव, विष्णुनगर, सांगवी प्र.भ., आंबे-वडगांव खु. व परधाडे या २२ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.