अमरावती, प्रतिनीधि रामचंद्र मुंदाने
कृषी उत्पन्न बाजार समिती तिवसा येथील सुरू असलेली नाफेडची चना खरेदी बंद केलेली असून लवकरात लवकर पुर्ववत सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.
नाफेड मार्फत दिनांक २५/६/२०२१ पर्यंत शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला. त्यानंतर खरेदी बंद करण्यात आली. तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेतमाल कोरोना संसर्गाच्या भितीने आणि लाॅकडाउनमुळे विक्रिकरीता मार्केट यार्डमध्ये घेऊन येण्याचे टाळले. लॉकडाऊन संपत नाही तोच शेतीच्या खोळंबलेल्या कामात शेतकरी वर्ग पुन्हा शेतीच्या कामात व्यस्त झाले. शेतीच्या कामातून उसंत काढून शेतकऱ्यांना चना विक्रीची ऑनलाईन नोंद करणे, दिलेल्या सूचनेनुसार माल पोहोचविणे या प्रक्रियेमध्ये काही शेतकरी अडकलेले आहे.
तरी या समस्येची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन यावर उपाययोजना करून नाफेडची हरभरा खरेदी किमान पंधरा दिवसांसाठी तरी सुरू करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिवसा शहर अध्यक्ष अजय सुरटकर, तालुका अध्यक्ष डॉ. सुभाष तवर, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष हेमंत बोबडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.