जळगाव दि. 20-
शिवाजी नगरचा रेल्वे पुल हा वाय आकाराचा बांधण्यात यावा, अशी मागणी असताना प्रशासनातर्फे टी आकाराचा पुल बांधण्यात येणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी शिवाजी नगर बचाव समितीतर्फे दि. 22 रोजी क्रांती चौक, शिवाजी नगरात जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा शिवाजी नगर बचाव समितीचे अध्यक्ष दिपककुमार गुप्ता यांनी बुधवारी दिली. सदर सभा राजकारण विरहित असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी नगर पुल पाडण्याचे काम सध्या रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रेल्वेच्या अखत्यारीतील कामाव्यतिरिक्त पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. प्रशासनातर्फे पुल हा टी आकारात बांधावा असा घाट घातला जात आहे. तर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी वाय आकारात पुल बांधावा अशी मागणी केली आहे.
वाय आकाराच्या पुलाची मागणी
शिवाजी नगर पुल उभारणीबाबत बोलताना गुप्ता यांनी वाय आकाराच्या पुलाची मागणी केली आहे. टी आकाराच्या पुलामुळे शहरवासिय तसेच ग्रामस्थांना सहाशे मीटर्सचा मोठा फेरा पडणार आहे. तर वाय आकाराच्या पुलामुळे केवळ तिनशे मिटरचे अंतर कापावे लागणार असल्याने वाय आकाराच्या पुलाची मागणी असल्याचे दिपककुमार गुप्ता यांनी लोकशाहीशी बोलताना सांगितले.
टी आकाराच्या पुलाचा आग्रह का?
शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची वाय आकाराच्या पुलाची मागणी करत आहेत. वाय आकाराचा पुल हा स्थानिक शिवाजीनगरवासीय व इतर गावांना सोयीस्कर ठरणार आहे. वाय आकाराच्या पुलामुळे तिनशे मीटरचा फेरा वाहनधारकांचा चुकणार आहे, नागरिकांच्या सोयीचे काम न करता टी आकाराच्या पुलाचा आग्रह का? असा प्रश्न जनसामान्यांना पडत असून यामुळे काही आर्थिक हित जोपासले जात आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.