शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
आपला देश हा कृषी प्रधान आहे. आचार्य म्हणजे बोलणे तसे जगणे आपला विचार आचरणातून जगतात ते म्हणजे आचार्य ! १९९१ पासून आपण खाजगीकरण स्विकारले आणि जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलली संचार क्रांती ने आज जग छोटे झाले . जीवनमूल्ये झपाट्याने प्रभावीत झाली आहेत . संपर्क क्रांतीमुळे साता समुद्रापलिकडे असणाऱ्या व्यक्तीशी आज आपला संपर्क आहे. पण घरा शेजारी कोण राहतो ते माहीत नाही अशी आज अवस्था आहे असे प्रतिपादन ख्यातनाम वक्ते अँड. प्रकाश पाठक धुळे यांनी केले.
सांस्कृतिक मूल्ये, उत्तमतेचा ध्यास, उदात्ततेचं दर्शन, चांगुलपणा, परस्परांबद्दल आदर, घर आणि शाळा यांची जाणीव, शिक्षक व विद्यार्थी, आई आणि तिचे मुल हे नाते १९९१ नंतर प्रभावीत झाले . भारतीय समाज व्यवस्थेचं खासगीकरणानंतर नुकसान झाले. भारतीय समाजजीवनात कुटुंब व्यवस्थेला महत्वाचे स्थान होते घर नात्यांच्या धाग्याने गुंफलेले होते मात्र आज सायबर युगात संचार क्रांती झाली परंतू मुकी झाली घरे. कुटुंब व्यवस्थेच्या वर समाज समाजाच्यावर राष्ट्र त्यावर विश्व पर्यावरण/ निसर्ग आणि त्यावर अध्यात्म हा आत्मीक उन्नतीचा विचार असा क्रम आहे. आजच्या काळात मुलाला आईची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. पाश्चिमात्य जीवनशैली ही व्यक्तीस्वातंत्राचा पुरस्कार करतांना कुटुंबाच्या नात्यातील भावबंध मात्र नाकारतांना दिसते. मूल्यांची जागा अर्थ घेत आहे पण हा अर्थ पुरुषार्थ नसला तर अनर्थ होईल. चाफेकर बंधु यांच्यात राष्ट्रीक मूल्ये त्यांच्या आईने रुजविली होती.
खोटेपणातून मोठेपणा आज निर्माण होत आहे, परंतु चांगुलपणा हरवत चाललाय. छत्रपती शिवाजी महाराज यांचं शत्रूने ही नतमस्तक व्हावं असं चारित्र्य होतं आणि ते त्यांच्या आईने केलेल्या संस्कारातून घडले होते. स्वामी विवेकानंद, सानेगुरुजी, वीर सावरकर, डॉ एपीजे कलाम हे त्यांच्या घरात कुटुंबात असलेल्या संस्कारक्षम वातावरणामुळे आयुष्यात मोठे कार्य करू शकले. असे विचार अॅड प्रकाश पाठक यांनी शेंदुर्णी येथे मांडले.
धी शेंदुर्णी सेकं. एज्यू सोसा. लि आणि आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड स्मृती व्याख्यानमाला वर्ष १३ चे पहिले पुष्प अॅड. प्रकाश पाठक यांनी ‘मुके झाली घरे ‘ या विषयावर गुंफले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख वक्ते प्रकाश जी पाठक, धी शेंदुर्णी सेकं. एज्यू सोसा. चे अध्यक्ष संजय गरुड, सचिव सतिषचंद्र काशिद, राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेचे तज्ञ संचालक उत्तमराव थोरात, धी शेंदुर्णी एज्यू . संस्थेचे संचालक सागरमल जैन, उज्वलाताई काशिद, सागरमल जैन, आचार्य गरुड प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास देशमुख, देवश्रीताई काशिद शेंदुर्णी एज्यु सोसाचे संचालक अभिजित काशिद, निकम सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
प्रास्ताविकातून संजय गरुड यांनी सदर वैचारिक मेजवानीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे अवाहन केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. संजय भोळे यांनी करून दिला. अॅड. पाठक भोसला मिलटरी स्कूलचे माजी अध्यक्ष, कबचौ उमविचे आधिसभा सदस्य तसेच अभाविपचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनास प्रारंभ केला. आज महाराष्ट्रात एक विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आहे.
सूत्र संचालन डॉ. संजय भोळे तर आभार डॉ. श्याम साळुंखे यांनी मानले. पंचक्रोशितील व्याख्यानप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.