जळगाव जिल्ह्यासाठी रेमडेसीवरचा पुरेसा साठा कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही !

0

जळगाव (प्रतिनिधी) : रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यासाठी रेमडेसीवर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला असता मुख्यमंत्र्यांनी याला होकार दिला. तर, ना. गुलाबराव पाटील यांनी आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वाच्या चर्चेत भाग घेतला.

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज ऑनलाईन या प्रकारात पार पडली. यात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जळगाव येथून सहभागी झाले. आजच्या बैठकीत लॉकडाऊन वा याला सक्षम पर्याय बाबत सविस्तर चर्चा झाली. यात ना. गुलाबराव पाटील यांनी अन्य दोन मंत्र्यासह वीक एंड लॉकडाऊनचा पर्याय सुचविला असता, याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दरम्यान, राज्यात नवीन निर्बंध लवकरच लागू करण्यात येत असून यात शेतमालाच्या वाहतुकीला बंदी घालू नये आणि खासगी प्रवासी वाहतुकीवर मात्र निर्बंध घालावेत अशी आग्रही मागणी त्यांनी केली असता याला देखील मान्यता देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात सध्या रेमडेसीवीरची खासगी पातळीवर कृत्रीम टंचाई सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमिवर शासकीय रूग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी देखील ना. पाटील यांनी केली. यावर जळगाव जिल्ह्यात रेमडेसीवरची टंचाई भासणार नाही इतका पुरेसा साठा उपलब्ध करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जनतेला आवाहन

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या प्रतिकारासाठी लसी बरोबरच स्वयंशिस्त महत्वाची असून याच्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे लसीकरण आहे. यामुळे कुणीही मनात शंका-कुशंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.