जळगाव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होवू नये याकरीता यंत्रणानी दक्ष रहावे ; जिल्हाधिकारी राऊत

0

जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेत.

देशातील काही राज्यांबरोबरच महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावले आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जमादार, यांचेसह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, बर्ड फ्लूचा संभाव्य प्रादुर्भाव होवू नये यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी दक्षता म्हणून आपल्या पोल्ट्रीफार्मचे सॅनिटायझेशन करुन घ्यावे. जिल्ह्यातील कुठल्याही पोल्ट्रीमध्ये पक्षांची मर दिसून आल्यास त्वरीत पशुसंवर्धन विभागाला कळवावे. असे पक्षी कुठेही विक्री करु नये शिवाय हे पक्षी इतर पक्षांमध्ये मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी. नगरपालिका क्षेत्रात जेथे मोठे मार्केट आहे तेथील विक्री होणारे मांस नगरपालिकेच्या पथकाने तपासण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.

जळगाव जिल्ह्यात सध्या अंदाजे 226 पोल्ट्री फार्म आहेत. या व्यावसायिकांशी पशुसंवर्धन विभागाने समन्वय साधून त्यांना आवश्यक त्या सुचना व मार्गदर्शन करावे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पशुसंवर्धन विभाग आवश्यक ती दक्षता घेत असून यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आल्याचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्ध शाम पाटील यांनी सांगितले. तसेच बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून तूर्त जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे ए. डी. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.