जळगाव । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन पुकारण्यात आले होते. जून महिन्यात मात्र तीन विविध टप्प्यात लॉकडाऊन अनलॉक करण्याची घोषणा केली होती. आज आजच्या तिसऱ्या टप्प्यात बहुतांश एकल दुकाने सुरू करण्यात आली. दरम्यान, लॉकडाऊन नंतर 78 दिवसानंतर जळगाव शहरात व्यापारी संकुले वगळता बहुतांश दुकाने सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती.
शहरातील शास्त्री टॉवर परिसर, महात्मागांधी मार्केट, दाणा बाजार, तिजोरी गल्ली, पोलन पेठ, सुभाष चौक परिसर, बळीराम पेठ, नवी पेठ तसेच कोर्ट रोड परिसरातील प्रमुख रस्त्यावर मोठी लगबग दिसून आली. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ३० जून पर्यंत जरी असला मात्र लोकांनीच हा लॉकडाऊन तोडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरातील मनपाचे व्यापारी संकुले मात्र ९० टक्के बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये बरीच शिथिलता दिली आहे. शहरातील बऱ्याच व्यवसायिकांनी तब्बल अडीच महिन्यानंतर नव्याने सुरूवात केली आहे. त्यातल्या त्यात आज सोमवार असल्याने शहरातील रस्त्यावर विविध खरेदीसाठी नागरीकांची मोठया प्रमाणावर गर्दी झाली आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेत कैऱ्यांची आवक झाल्याने लोणचे बनविण्याचे मसाला खरेदीसाठी महिलांची रेलचेल दिसून आली.आज शहरातील विविध भागात रिक्षांचीही वर्दळ दिसून आली आहे.
सोशल डिस्टन्सचा फज्जा
बाजारपेठेतील विविध दुकानात साहित्य घेण्यासाठी काही नागरिक सोशल डिस्टन्स पाळत होते, मास्क तोंडावर बांधत होते. मात्र काही नागरिक गर्दीतही मास्क न लावता साहित्य खरेदी करताना दिसून आले. विशेष बाब म्हणजे बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापर करतांना दिसून आले नाही. सोशल डिस्टन्सिंगचा पुर्णपणे फज्जा उडाला असून कोरोना गेला की काय ? यक्षप्रश्न असा अनेकांना पडला होतो. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढीसाठी हे घातक आहे. पोलिसांनी सोशल डिस्टन्सचे पालन न करणारे, मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.