खामगाव (प्रतिनिधी) : खामगाव- जालना महामार्गावरील मौजे गणेशपुर येथे भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील मौजे गणेशपुर या गावातून खामगाव – जालना हा महामार्ग जात असून, यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे येथील आबालवृध्द नागरिकांना रस्ता सहज पार करता येत नाही. फार वेळ ताटकळत उभे राहावे लागते. या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुल नसल्याने महामार्ग ओलांडत असताना अपघात होण्याची शक्यता आहे. तरी मौजे गणेशपुर येथे भुयारी मार्ग करणे आवश्यक असून याबाबत प्रशासकीय मंजूरी देवून संबधित विभागास योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती वजा मागणी निवेदनात केली आहे.