खोटी बातमी दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द होणार

0

नवी दिल्ली:

खोट्या बातम्या देणं आता पत्रकारांना महागात पडणार आहे. खोट्या बातम्यांवर अंकुश लावण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत. खोट्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तिसऱ्यांदा खोटी बातमी प्रसिद्ध केल्यास संबंधित पत्रकाराची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे.

पत्रकारांच्या मान्यतेसंबंधी सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खोटी बातमी प्रसिद्ध अथवा प्रसारित झाल्याचं स्पष्ट झालं आणि हा प्रकार संबंधित पत्रकाराकडून पहिल्यांदा घडला असेल तर त्याची मान्यता सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. दुसऱ्यांदा खोटी बातमी दिल्यास मान्यता एक वर्षांसाठी रद्द करण्यात येईल. तसंच तिसऱ्यांदा खोटी बातमी प्रसिद्ध केल्यास पत्रकाराची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

वृत्तपत्रात खोटी बातमी प्रसिद्ध झाल्यास त्यासंबंधी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करता येईल. तर, वृत्तवाहिन्यांवर बोगस बातमी प्रसिद्ध केल्यास त्यासंबंधी एनबीएकडे (नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशन) तक्रार करता येईल, असंही माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नमूद केलंय. डिजिटल मीडियाबाबत यामध्ये कोणताही उल्लेख नाही. बातमी खोटी आहे किंवा नाही, हे संबंधित संस्थांनी १५ दिवसांत सांगावं, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.