खामगाव (प्रतिनिधी) : पारतंत्र्यापासून प्रस्तावित असलेला खामगाव – जालना रेल्वे मार्ग अद्याप दुर्लक्षित आहे. अनेक निवडणुकांमध्ये गरम मुद्दा राहिलेला खामगाव – जालना रेल्वे मार्ग निवडणुकीनंतर दुर्लक्षित राहिला त्यामुळे जनतेचे सुध्दा नेत्यांच्या आश्वासनावर विश्वासच राहिला नाही. परंतु रेल्वे संघर्ष समिती ने आपला लढा सोडला नाही म्हणून आज पुन्हा रेल्वे ची केंद्रीय समिती सर्वेक्षण करण्यासाठी आपल्या जिल्ह्यात येत आहे. या आधीच्या सर्वेक्षणात रेल्वे ला उत्पन्नाचा प्रश्न समोर करून हा मार्ग रेंगाळत ठेवला.
आज सर्वेक्षणामध्ये इतरांचा सुध्दा सहभाग घेतल्या मुळे सत्याग्रह शेतकरी संघटनेचे संयोजक कैलास फाटे यांनी जिल्हाधिकारी यांना मेल करून हा मार्ग खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथून न्यावा करिता सुचवले आहे. या वेळी फाटे यांनी सांगितले की लोहमार्ग हा शेकडो वर्ष्याच्या दूरदृष्टी ने आखल्या जातो आणि लाखनवाडा हे भविष्यातील तालुक्याचे ठिकाण असून ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ बनणारे ठिकाण आहे.
सोबतच सिंदखेडराजा हे माँ जिजाऊ चे जन्मस्थान असल्यामुळे व शेजारी थोड्या अंतरावर असलेले जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर आहे त्या दृष्टीने हा मार्ग खामगाव – लाखनवाडा – चिखली – सिंदखेडराजा – जालना असा जोडावा जेणेकरून ऐतिहासिक स्थळ व भविष्यातील बाजारपेठ मुळे रेल्वे विभागाला भरपूर उत्पन्न मिळवून देणारा मार्ग असेल असे ते म्हणाले. त्यामुळे जिल्हाधिकारी व राजकीय लोकप्रतिनिधी ह्या मार्गाकडे किती गांभीर्याने घेतात हे महत्वाचे ठरणार आहे.