जळगाव :-खानदेशात पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या सहा ते सात दिवसापासून कुठेही पाऊस आलेलं नाही मध्यंतरी पूर्वमोसमी पाऊस आला. पण हा पाऊस सर्वत्र आणि पेरणीयोग्य नसल्याने पेरणीलाही सुरुवात झालेली नाही. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने कोरडवाहू कापूस, उडीद, मूग व तुरीची पेरणी जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव आदी भागांत केली आहे. परंतु त्यावर चांगला पाऊस आलेला नसल्याने ही पेरणी वाया जाईल, अशी पावसासोबत वादळही होते.
त्यात विजेचे खांब वाकले, केळीचे नुकसान झाले. नुकसान सहन करूनही शेतकरी खरिपासाठी उभा राहिला. जूनच्या सुरुवातीला पावसाळी वातावरण होते. यामुळे शेतकरी उत्साहाने कामाला लागले. परंतु गेले पाच ते सहा दिवस कुठेही पाऊस नाही. सुसाट वारा सुटत आहे. जमिनीतील ओलावा घटत आहे. पूर्वहंगामी कापूस, मिरची, केळी आदी पिके जगविण्यासह वाढविण्यासाठी शेतकऱ्यांची सिंचन व इतर बाबींची लगबग सुरू आहे. पूर्वहंगामी कापूस लागवड पूर्ण झाली आहे.
कापूस लागवड वाढेल, अंदाज सुरुवातीपासून व्यक्त केला जात आहे. परंतु पावसाबाबत सकारात्मक माहिती, स्थिती दिसत नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. पेरणीसाठी पूर्वमशागत पूर्ण झाली आहे. पाऊस नसल्याने चार-पाच दिवसांत कृषी निविष्ठा, बियाणे बाजारातही फारसा उत्साह दिसत नाही. ज्वारी, मका, बाजरी, कापूस बियाण्याची हवी तशी विक्री झालेली नाही. खतांच्या दुकानातही गर्दी नसल्याचे चित्र आहे.