नागपूर:
पुण्यातील कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचा कट नक्षलवाद्यांनी रचल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. वाद चिघळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दलित आंदोलनाचे लोण पसरावे या हेतूने नक्षलवाद्यांनी कोरेगाव भीमा येथे प्रदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन केले होते. हिंसाचाराच्या आदल्या दिवशी पुण्यात एका गटाकडून एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. त्यातील महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे, असे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मिळाली आहे. ‘सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार ३१ डिसेंबरला पुण्यातील शनिवारवाड्यात आयोजित केलेल्या ‘एल्गार परिषदे’त सहभागी झालेले लोक प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरुपात नक्षलवाद्यांशी संबंधित आहेत. अशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये नक्षलवादी घुसखोरी करतात किंवा हिंसा भडकावतात. याआधीही हे प्रकार घडले आहेत,’ असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.