नवी दिल्ली – जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटविण्याला आव्हान देणाऱ्या जवळपास 8 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत. या सर्व याचिकांवर आज कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. या याचिकेत कलम ३७० हटविणे, जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीची मुदत, तसेच काश्मीरमध्ये लावण्यात आलेले निर्बंध यांना आव्हान देण्यात आलं आहे. तसेच या याचिकेत काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांचीही याचिका आहे. ज्यात त्यांनी स्वत:च्या राज्यात म्हणजे काश्मीरात जाण्याची परवानगी मागितली आहे.
या याचिकांवरील सुनावणी मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश एस.ए बोबडे, न्या. एस अब्दुल नजीर यांचे खंडपीठ करणार आहे. जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फेरन्स पक्षाचे प्रमुख सज्जाद लोन यांनी कलम ३७० हटविणे आणि राज्याचं पूर्नविभाजान याला कोर्टात आव्हान दिलं आहे. तसेच मानवाधिकार कार्यकर्ते इनाक्षी गांगुली आणि प्रोफेसर शांता सिन्हा यांनी काश्मीरचा विशेष दर्जा संपविल्यानंतर तेथील लहान मुलांना बेकायदेशीपणे कैद करण्याच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.