प्रा.धिरज पाटील यांच्या मागणीला यश
भुसावळ (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि या लॉकडाऊनमुळे देशभरातील आस्थापने, वेल्डिंग वर्कशॉप, सलून दुकाने, रसवंती, ज्युस दुकाने, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, हॉटेल्स बहुतेक सर्वच छोटे मोठे उद्योग आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद केला होता. परिणामी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार/मागणी माफ करण्यात यावी व या सर्व विज ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील व पदाधिकाऱ्यांनी केली होती.
विज बिलात सामान्यांचे ४०३ रुपये माफ
लॉकडाउनमुळे वीज वापर बंद असला तरी औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना भरमसाठ बिले पाठविली जात असल्याने अस्वस्थता पसरली होती. मात्र, या ग्राहकांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत संपूर्ण बंद असलेल्या औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना शून्य रुपयाचे वीजबिल देण्यात येणार आहे व स्थीर आकार ४०३ रुपये रद्द करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धन्यवाद पत्र पाठवले
वापर नसतानाही सरासरीनुसार बिल आकारणी होत असल्याने ग्राहकांमध्ये अस्वस्थता होती. लॉकडाउनच्या काळातील वीज बिलांची रक्कम भरताना त्यावर थकबाकी शुल्क किंवा व्याज आकारणी माफ झाली. तीन महिन्यानंतर बिल भरणा सुरू झाल्यानंतर पुढील तीन महिने तीन टप्प्यात बिल भरण्यासाठी मुभा या ग्राहकांना दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना धन्यवाद पत्र पाठवले आहे असे प्रा.धिरज पाटील यांनी कळविले आहे.