मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढताना दिसत आहे. राज्यात शनिवारी ३२८ नवे करोनाबाधीत रुग्ण सापडल्याने राज्यातील करोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. तर कोरोनामुळे राज्यात २११ जणांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर आज (19 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.
‘संपूर्ण जगाची अवस्था सरणार कधी रण… या गीतासारखी झाली आहे. हा शत्रू आपल्याच लोकांच्या माध्यमातून आपल्यावर हल्ला करतोय. पण, यात आपण एक पराक्रम केला आहे. तो म्हणजे संयम. उद्या या संयमाला सहा आठवडे पूर्ण होतील. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतोय की, करोनासदृश्य लक्षणं आढळली तर तातडीनं रुग्णालयात जा,’ असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पालिकेतील डॉक्टरांनी तसेच इतर तज्ज्ञ टीमशी संवाद साधला. तसेच उद्यापासून काही जिल्ह्यातील लॉकडाऊन हा शिथील करण्यात येणार आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांशी चर्चा केली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘करोनाशी लढा देत असताना राज्याच्या अर्थव्यवस्थेचा गाडा गाळात रुतला आहे. अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून २० एप्रिलपासून काही भागात काही उद्योग आणि सेवा क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं करोनाचा पार्श्वभूमीवर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील काही प्रमाणात उद्योग, सेवा सुरू करण्यात येत आहेत. या काळात कामगारांची व्यवस्था कामाच्या ठिकाणी करावी, असं सांगण्यात आलं आहे. कामगारांची वाहतूक करता येणार नाही,’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.