लखनौ: उत्तरप्रदेशला गुरूवारपासून सलग दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे 24 तासांत घडलेल्या विविध दुर्घटनांत 28 जण मृत्युमुखी पडले. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी घरे आणि झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. त्याचा सर्वांधिक फटका सीतापूर, लखीमपूर खेरी जिल्ह्यांना बसला.
मृतांमध्ये काही महिला आणि बालकांचाही समावेश आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 4 लाख रूपयांची मदत जाहीर केली. पावसाच्या तडाख्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची माहिती घेण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जाणार आहेत.