जळगाव:- कुटुंबाची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्याने शिक्षणात अडथळे येऊ नये म्हणून कित्येक होतकरू विद्यार्थी काम करीत अर्थार्जन करीत असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे विशेषतः गरीब विद्यार्थ्यांवर कामही नाही आणि शिक्षणही बंद असे दुहेरी संकट ओढवले आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात करोनामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले. काही महिन्यांपूर्वी करोना कमी झाल्याने या विद्यार्थ्यांना कामाची आशा होती. मात्र, बाजारात कमालीची मंदी असल्याने कित्येकांवर कामापासून वंचित राहण्याची वेळ आली.
गेल्या दीड महिन्यापासून करोनाचा संसर्ग वाढला आहे.
टाळेबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे सर्वकाही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांच्या हाताला काम मिळाले, त्यांचेही काम हिरावले गेले आहे. त्यामुळे कुटुंबावर संकट ओढवले.
या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. विद्यापीठाचा आधारही हरवला गेल्या वर्षभरापासून महाविद्यालये सुरू नाहीत. परिणामी ‘कमवा व शिका’ या योजनेच्या लाभापासून विद्यार्थी वंचित आहेत. महाविद्यालयस्तरावर जे विद्यार्थी होतकरू आहेत आणि काम करून शिकतात त्यांना मोठा फटका बसला आहे. रात्रशाळेत शिकणाऱ्या मुलांची परिस्थिती गंभीर आहे. टाळेबंदीमुळे त्यांच्या हातातले काम हिरावल्या गेले आहे. या शिवाय त्यांच्या शिक्षणावरही मर्यादा आली आहे.