मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय रेल्वे प्रशासनाने कमी प्रतिसादाचे कारण देत कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, कोल्हापूर-मनगुरू एक्सप्रेस, कोल्हापूर-बिदर एक्सप्रेस, कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस, मिरज-हुबळी लिंक एक्सप्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट एक्सप्रेस कायमच्या रद्द केल्या आहेत.
तसेच कोल्हापूर-पुणे पॅसेंजर, मिरज-हुबळी पॅसेंजर, मिरज-परळी पॅसेंजर, मिरज-कॅसलरॉक पॅसेंजर या गाड्यांचे रुपांतर एक्सप्रेस गाड्यांमध्ये केले.
फक्त हंगामात फुल आणि इतर वेळी तोट्यात धावणाऱ्या एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या टप्प्याटप्प्याने रद्द करण्याची प्रक्रिया रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. रेल्वेच्या नव्या धोरणानुसार पॅसेंजर गाड्या आता फक्त १५० किमी पर्यंतच धावतील. सर्व १५० किमी.च्या पुढे धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांचे रुपांतर एक्सप्रेस गाड्यांमध्ये करण्याचा निर्णय झाला आहे.
एखाद्या मार्गावर गाडी १२ महिने फुल धावत असल्यास त्याच मार्गावर एक हमसफर सुरू केली जाईल. पुढील काळात इंटरसिटी, वंदे भारत, दुरान्तो, संपर्कक्रांती अशा एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याला प्राधान्य देण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले.
मिरज-सोलापूर एक्सप्रेसचा विस्तार करून कोल्हापूर-गुलबर्गा एक्सप्रेस, बेळगाव-पुणे इंटरसिटी, मिरज-मंगळुरू महालक्ष्मी एक्सप्रेस, बंगळुरू-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस व्हाया मिरज, कुर्डुवाडी, वास्को-हजरत निजामुद्दीन गोवा हमसफर एक्सप्रेस, यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन हमसफर एक्सप्रेस या नव्या गाड्या सुरू करण्याच्या हालाचाली सुरू आहेत.
गोवा-दिल्ली साप्ताहिक हमसफर बंद करून गोवा-दिल्ली नियमित हमसफर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.