जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 

पळण्याच्या नादात सहा जणांचा बुडून मृत्यू

0

 

कोल्हार, लोकशाही न्युज नेटवर्क

पावसाळी पर्यटनादरम्यान पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. मात्र कृष्णा नदीच्या काठी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नदीकाठी काही तरुण जुगार खेळत असताना पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी तरुणांनी बोटीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता बोट नदीत उलटली आणि 6 जणांचा बुडून मृत्यू झाला. तर, दोघेजण पोहत आल्यामुळे बचावले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील जुने बळोती येथे ही घटना घडली. कृष्णा नदीच्या काठावर काही जण जुगार खेळत असताना पोलिसांनी सायंकाळी छापा टाकला. यावेळी पोलिसांना घाबरून 8 तरुणांनी गोलाकार बोटीत बसून पळ काढला. पण नदीच्या भोवऱ्यात सापडल्याने बोट कलंडली आणि सहा जणांना नदीत बुडून आपला जीव गमावला लागला. तर दोघे जण पोहून आल्याने वाचले.

कोल्हार शहरातील रहिवासी महबूब वालीकार वय 30, तयब चौधरी वय 42, रफिक जालगार उर्फ बांदे वय 55, पुंडलिक मल्लाप्पा यंकंची वय 36, दशरथ गौडर सूळीभावी वय 66 अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर आणखी एका मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तसेच या बोटीतील सचिन कटबर व बशीर होनवाड त्या दोघांना पोहता येत असल्याने पोहत नदीकाठावर सुरक्षितपणे पोहोचल्याने या दोघांचा जीव वाचला आहे.

अग्निशमन दल व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य हाती घेण्यात आले. या घटनेनंतर घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली. यावेळी कुटुंबाने हंबरडा फोडला. रात्र झाल्याने मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अडचणी आल्या. यावेळी जमलेल्या जमावाकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हार पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या घटनेची माहिती मिळताच साखर मंत्री व बसवन बागेवाडीचे आमदार शिवानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.