जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवरही लागू करा!

हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर महाराष्ट्र अंनिसची मागणी

0

 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

हाथरसमध्ये भोले बाबा यांच्या सत्संगाचा वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 121 भाविक मृत्यूमुखी पडले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू झालेला जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवरही लागू व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. महाराष्ट्रात लागू झालेला कायदा संसदेत मांडण्याची विनंती महाराष्ट्रातील खासदारांना करण्यात येणार आहे. अंनिसने यासंदर्भात एक पत्रक प्रसृत केले आहे.

अशा स्वरूपाच्या घटनाच्या नंतर प्रत्यक्षात त्याला जबाबदार बाबा-बुवा आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी हे नामानिराळे राहतात आणि काही प्याद्यांचा बळी दिला जातो हे लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी, अशीही मागणी या पत्रकात करण्यात आली आहे. जादूटोणाविरोधी कायद्याच्या महाराष्ट्रातील गेल्या 10 वर्षांच्या अंमलबजावणीमध्ये सर्व धर्मांच्या बाबा-बुवांच्या विरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाल्याने हा कायदा सर्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मूलन करणारा असल्याचे सिद्ध झाले असल्याचेदेखील पत्रकात म्हटले आहे. या कायद्याच्या गैरवापराची एकही घटना समोर आलेली नाही हेही महत्त्वाचे असल्याचे अंनिसने म्हटले आहे.

राज्यसभेत काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करण्याची मागणी केली. सभापती जगदीप धनखड यांनी देखील जादूटोणाविरोधी कायद्याविषयी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून सदनाच्या पुढे मांडावी असे म्हटले आहे. ही स्वागतार्ह गोष्ट असल्याचे या पत्रकात अंनिसने नमूद केले आहे. महाराष्ट्रात अंनिसच्या प्रयत्नातून झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्याद्वारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे. असाच कायदा देशभर लागू केला तर भोलेबाबासारख्या बाबांना आळा बसू शकेल. पूर्वी पोलिस कर्मचारी असलेल्या आणि पुढे जाऊन स्वत:ला बाबा नारायण हरी म्हणवून घेणाऱ्या बाबाच्या विरोधात देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही अंनिसने केली आहे.

जिवाची काळजी घ्या
या निमित्ताने ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी’ या अभियानात तयार झालेल्या 25 पुस्तिका हिंदीमध्ये अनुवादित करून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हज यात्रा, अमरनाथ यात्रा अशा अनेक धार्मिक ठिकाणी दर वर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांचे मृत्यू होतात. श्रद्धा जपताना आपला जीव आणि आरोग्य याची काळजी घ्यावी, असे आवाहन अंनिसच्या वतीने मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, अण्णा कडलास्कर, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, फारुख गवंडी, सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, प्रकाश घादगिने, प्रशांत पोतदार, मुक्ता दाभोलकर, विनोद वायंगणकर, अशोक कदम, प्रवीण देशमुख यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.