शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाने व जिल्हाधिकारी जळगांव यांच्या आदेशानुसार दिवसाची जमावबंदी व रात्रीची संचारबंदीसाठी शेंदुर्णीत पोलीस प्रशासनाने जोरात कंबर कसली असुन यासाठी आज संध्याकाळी पहुरचे पो.नि.राहुल खताळ हे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेत शहरात याची कडक अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी शहरातील बाजारपेठेत नागरिकांना आवाहन करत होते.
संध्याकाळी शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे शांतता कमेटीची बैठक झाली. या बैठकीत शासनाने घालुन दिलेल्या अटी,बाजारपेठ, व्यापारी, नागरिक यांनी घ्यावयाची काळजी ,अंमलबजावणी साठी सर्वांचे सहकार्य ,तसेच विविध विषयांवर चर्चा झाली. शाब्दिक चकमक,राजकीय फैरी ,एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सुद्धा सोईस्कर पणे पहायला मिळाली. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर आपोआपच गावाचेही आरोग्य सुदृढ राहण्यास मदतच होणार आहे तेव्हा करोनाचे संकट सर्वांनी मिळुन शासन, प्रशासन यांनी वेळोवेळी केलेल्या आवाहनाला साद प्रतिसाद दिला तर निश्चितच याचा लाभ शहरातील सर्व नागरिकांना होणार आहे. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते,पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार ,नागरिक, शांतता कमेटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिटिंग झाल्यावर स्वतः पो.नि.राहुल खताळ, पोउनि. किरण बर्गे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सह शहरात फिरुन नागरिकांना रात्रीच्या संचारबंदी व दिवसभराच्या जमावबंदी बाबत ध्वनिक्षेपकावरुन अंमलबजावणी व सहकार्याचे आवाहन केले.