जामनेर : – तालुक्यातील तोरनाळा येथे तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि.१ रोजी घडली.महेंद्र विक्रमसिंग पाटील वय (35) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिवारावर व गावावर शोककळा पसरली आहे.
महेंद्र पाटील हे जवळच असणाऱ्या आपल्या गट नंबर 264 या शेतात सकाळी गेले.साडेअकराच्या सुमारास आपल्या गुरांना पाणी पिण्यासाठी हौदात पाणी सोडण्याकरिता शेतातील वीज पंप चालू करण्यासाठी ते पुढे सरसावले.परिसरात नुकत्याच झालेल्या पावसाने संपूर्ण शिवार ओलेचिंब झाले होते.त्यामुळे सरळ विद्युत प्रवाह त्यांच्या वीज खांबावरील पेटी मध्ये उतरल्याने महेंद्र यांनी पेटीला हात लावताच विजेचा जोरदार झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महेंद्रसिंह हे अत्यंत कष्टाळू सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी होते.त्यांच्याकडे दोन एकर शेतीचे क्षेत्र असून या शेतीच्या उत्पन्नावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत असे.त्यांचे पश्चात दोन मुले,एक मुलगी,पत्नी,आई- वडील असा आप्तेष्ट परिवार आहे.त्यांच्या आई-वडिलांचे ते एकुलते एक चिरंजीव होते.