मुंबई: राज्यात राजकीय वातावरण तापले असताना आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल येत्या दोन दिवसात वाजणार आहे. गुरुवारी, १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचा नाशिक येथे समारोप होणार आहे. या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांची सभा संपताच रात्री उशिरापर्यंत अन्यथा शुक्रवारी विधानसभा निवडणूकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यांत मतदान व मतमोजणी प्रक्रिया दिवाळीआधी पूर्ण करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा २० सप्टेंबर रोजी करण्यात आली होती तर १५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. राज्यांचे निकाल १९ ऑक्टोबर रोजी लागले होते. २३ ऑक्टोबर रोजी दिवाळी होती. दरम्यान, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा उद्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर बुधवारी सह्याद्री अतिथिगृह येथे राज्यातील निवडणूकीच्या तयारीचा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी मान्यताप्राप्त राजकिय पक्षांबरोबरच पोलीस अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनाही चर्चेला बोलावण्यात आले आहे.