मुंबई : येत्या मे महिन्यात राज्यातील सर्व शहरांना शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येणार आहे. राज्यात येत्या 3 मे पासून 31 मे पर्यंत अनेक ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तसेच सूर्य दररोज 50 अंश° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते. त्यामुळे प्रत्येकाने या खगोलीय घटनेचे साक्षीदार व्हावे असे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या 3 मे पासून 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस येत आहेत.
तर मुंबई, नवी मुंबई, बोरीवली, ठाणे, कल्याण, बदलापूर, वसई, विरार या ठिकाणी 15 मे पासून 28 जुलैपर्यंत शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. यावेळी प्रत्येक शहरासाठी विविध दिवशी आणि वेळी शून्य सावली अनुभवता येणार आहे. त्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी 3 मे रोजी तर धुळे जिल्ह्यात 31 मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.
विदर्भात 15 मे पासून अनुभवता येणार शून्य सावली
विदर्भात 15 मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे शून्य सावली अनुभवता येईल. त्यानंतर 17 मे रोजी अहेरी, आल्लापल्ली, 18 मे मुलचेरा, 19 मे पुसद, बल्लारशा, चामोर्शी, 20 मे चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल, 21 मे चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, 22 मे बुलडाणा, यवतमाळ, आरमोरी, 23 मे खामगाव, अकोला , देसाईगंज, ब्रह्मपुरी, नागभीड, 24 मे शेगाव, वर्धा, उमरेड,दर्यापूर, 25 मे अमरावती, तेल्हारा, 26 मे नागपूर, भंडारा, परतवाडा, 27 मे परतवाडा, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक, 28 मे वरुड,नरखेड येथे शून्य सावली अनुभवता येणार आहे.