जामनेर(प्रतिनीधी):- शहरातील किराणाचे प्रसीध्द होलसेल व्यापारी राजु उर्फ राजकुमार प्रकाशचंद कावडीया यांचेवर बनावट टाटा नमक (मिठ) प्रकरणी गुरुवार रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जामनेरसह परीसरामधील किराणांवर टाटा या कंपनीचे बनावट मिठ विक्री होत असल्याची कुणकुण लागल्याने तालुक्याची प्रमुख एजन्सी असलेल्याच ठिकाणावर कंपनीने नेमलेल्या तपास अधिकाऱ्यांनी पोलीसांच्या मदतीने गुरूवार (२१) रोजी मयुर किराणावर छापा टाकला होता.
दुकानाचे मालक आणी एजन्सीचे संचालक राजु कावडीया त्यावेळी माझ्याकडे टाटा नमकच काय तर कोणताही माल बनावट विकण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याची प्रतीक्रीया देऊन सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र तपास अधिकाऱ्यांनी माघार न घेता त्यांच्या सर्व गोदामांची पहाणी केली,त्यावेळी मात्र कावडीयांच्या दाव्याची हवाच निघुन गेली.
तपासात दुकानासह अन्य गोदामांमधुन प्रत्येकी ५० किलोच्या नकली मीठाच्या ३१२ गोण्या हस्तगत केल्या.काही गोण्या फुटलेल्या ईतस्तः विखुरलेल्या होत्या. मोहम्मद हुसेन चौधरी रा जोगेश्वरी मुंबई यांच्या फिर्यादीनुसार बनावट मिठ साठवणुक व विक्री प्रकरणी संशयीत आरोपी राजु कावडीया यांचेवर भारतीय दंड विधान कलम ४८२,४८६ व प्रतीलिपी अधिकार अधिनियम १९५७ सुधारीत अधीनीयम १९८४ आणी १९९४ अंतर्गत कलम ५१ व ६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे बनावट मिठाची १ किलोचे पाऊच सात-आठ रूपयांमधे चोरट्या मार्गाने खरेदी करून ग्राहकांना तेच बनावट (नकली) मिठ विस रूपयांवर विकल्या जात होते.कावडीयांचा हा नकली मीठ विक्रीचा गोरख धंदा अनेक वर्षांपासुन सुरू होता हे विशेष.