पुणे: कोरोना संकटामुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागतोय. मात्र माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत. वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झालं असून आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने पंढरपूरला देवभेटीस जाणार आहेत.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात होते. दरम्यान त्यांच्या उपस्थितीमध्ये वारीबाबत बैठक झाली. या बैठकीत पायी वारी सोहळ्याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत दशमीला निर्णय स्पष्ट होईल.