ध्येय व यश प्राप्ती साठी गरीबी अडसर ठरत नाही- उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे पाटील

0
 पाचोरा येथे गुणवंतांचा गुणगौरव व विद्यार्थी पालक मेळावा
पाचोरा  प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे ? हे ध्येय निश्चित करावे व  त्याच्या प्राप्तीसाठी अथक परिश्रम करून यशस्वी व्हावे. या प्रक्रियेत गरीबी अथवा इतर कोणतीही परिस्थिती अडसर ठरत नाही. ज्यांचे ध्येय व परिश्रम कमकुवत असतात ते गरिबी व परिस्थितीचा बहाणा करतात त्यामुळे त्यांना यशस्वी होता येत नाही. जिद्द, मेहनत व वेगळे काही करून दाखवायची महत्वाकांक्षा असेल तर आहे त्या परिस्थितीतही ध्येय प्राप्ती करून यशस्वी होता येते” अशा आशयाचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांनी पाचोरा येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व विद्यार्थी पालक मेळाव्यात अध्यक्षपदावरून बोलतांना केले.
 स्वा.सै. (कै) दामोदर लोटन महाजन बहुद्देशीय संस्था, ध्येय अकॅडमी व यांच्या वतीने विविध परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव तसेच विद्यार्थी – पालक मेळावा शुक्रवार दि. २१ रोजी स्वामी लॉन्स वर आयोजित करण्यात आला. राजेंद्र कचरे पाटील अध्यक्षस्थानी होते .
     याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार किशोर पाटील, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पी.टी.सी. चेअरमन तथा पालिका गटनेते संजयनाना वाघ, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोलेसर, डॉ. रुपेश पाटील, एम. एम. वरिष्ठ महाविद्यालयाच्या मॅथ विभाग एच.ओ.डी. प्रा. वैष्णवी महाजन, शिवव्याख्याते संतोष पाटीलसर ध्येय अकॅडमीचे संचालक तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते. सरस्वती व स्वातंत्र्य सैनिक कै. दामोदर महाजन यांचे प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रम प्रारंभ झाला. याप्रसंगी गेल्या काही वर्षां पासुन राज्यभर शिवचरित्र सांगून मिळालेले मानधन वृद्धाश्रमास मदत म्हणून देणे व गोरगरिबांचे अंत्यसंस्कारासाठी खर्च तर वृध्दाश्रमातील मृत झालेल्या माता- पिता यांचे अत्यंसंस्कार स्वतःआपल्या हातुन करणे असे आदर्श कार्य संतोष पाटील (गोराडखेडा) हे करीत असल्याने त्यांचे माता – पिता रामदास पाटील व शकुंतला पाटील यांना गौरविण्यात आले. तसेच चौथी व आठवी स्कॉलरशिप परीक्षा, टॅलेंट हंट, एम.टी.एस., एन.टी.एस. यासह विविध स्पर्धा परीक्षा, संगीत, गायन, वकृत्व स्पर्धेतील गुणवंतांना पदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यात हर्षदा जाधव, हर्षल चौधरी, भाग्यश्री चौधरी, नेहा पाटील, कावेरी पाटील, मनस्वी जाधव, विनायक पाटील, वेदांत कोठावदे, सोमेश पाटील, सतीश पाटील, पद्मभूषण पाटील, ललित वाकलकर, राहुल खैरनार, कमलेश सोनार या गुणवंतांचा सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांच्या मातांसाठी लकी ड्रॉ काढून १० पैठण्यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या च दिवशी ध्येय अकॅडमी चा विद्यार्थी डॉ. अभय भोसले हा एम.बी.बी.एस. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा स्टेथोस्कोप देऊन गौरव करण्यात आला त्याचवेळी संचालक संदीप महाजन यांनी येणारा दिपावली सुट्टीत अकॅडमी तील आतापर्यंत यश प्राप्त करून विविध पदावर पोहोचलेले सर्व विद्यार्थ्यांचा गौरव मेळावा दिपावली सुट्टीत आयोजित करणार असल्याचे जाहीर केले.
    याप्रसंगी बोलतांना राजेंद्र कचरे यांनी आपल्या उपजिल्हाधिकारी पदापर्यंतची वाटचाल विद्यार्थ्यांसमोर मांडली. यशापर्यंत पोहोचण्यासाठी गरिबीचा बाऊ न करता जिद्द, मेहनत, चिकाटी कायम ठेवली तर ध्येय प्राप्त करता येते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवावी, व्यसनांपासून दूर रहावे, कितीही मोठ्या पदावर गेलो तरी आई -वडील, गुरुजन व समाज यांच्या प्रती आपुलकी, आदरभाव व सुसंवाद ठेवावा. जीवनाच्या वाटचालीत चांगले – वाईट ओळखून चांगल्या मित्रांचा सहवास ठेवावा व ज्या ही पदावर आपण काम करू त्या पदाचे महत्व, महात्म्य व आदर्श कायम ठेवावा असे स्पष्ट केले.
 ईश्वर कातकडे, प्रा. राजेंद्र चिंचोले, प्रा. वैष्णवी महाजन, संतोष पाटील यांनीही विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचाली संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केले. संजय वाघ यांनी गुणवंत विद्यार्थी व पालक यांच्यासाठी पी.टी.सी. संस्थेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत व सहकार्य देण्याचे आश्वासित केले .
विद्यार्थी व पालकांनी देखील प्रातिनिधिक स्वरूपात अकादमीच्या गुणवत्ते संदर्भात मते मांडली. कार्यक्रम सुमारे चार तास चालला. यशस्वीतेसाठी ए. जे. महाजन, शितल महाजन, अतुल चित्ते, मिलिंद सोनवणे, मनोज बडगुजर, केदार पाटील, सागर शेख,भैय्या अहिरे, संजय पाटील, ईश्वर सोनवणे, रंजना सोनवणे कृष्णा चित्ते आदींनी परिश्रम घेतले .संदीप महाजन यांनी प्रास्ताविक केले. मुकेश मोरे व संगीता लासूरकर यांनी सूत्रसंचालन तर ललीता पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीत गायनाने सांगता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.