जळगाव : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता भारतात आपले हात-पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या ५०० च्या वर गेल्याने चिंता व्यक्त केली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १०१ वर गेली आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली तरीदेखील जळगाव शहरातील नागरिक बाहेर फिरत असून रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चोप दिला जात आहे.
शहरातील विविध भागात सचांरबंदीमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरीकांना पोलिसांकडून चोप दिला जात आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना मास्क किंवा रुमाल बांधण्याचे सूचना यावेळी पोलिसांकडून देण्यात येत आहे. तसेच मेहुनबारे येथील बसस्थानक परीसरात बाहेर फिरणाऱ्या नागरीकांना साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिंन बेंद्रे यांच्यासह पोलीस पथकाने चांगलाच प्रसाद दिला.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व सिमा तात्काळ बंद करण्यात आल्या असून पोलीस अधिक्षक, जळगाव व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संयुक्तरित्या जिल्हातील सर्व सिमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करून त्यांना प्रवेश व निर्गमन करण्यास प्रतिबंध केले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही नागरिकास जिल्ह्याबाहेर जाण्यास किंवा बाहेरिल जिल्ह्यतील नागरिकास जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.