नवी दिल्ली : भारतात जवळपास सर्वच लोक दुचाकीचा वापर करतात. मात्र, सध्या या गाड्यांवरील जीएसटीचा दर लक्झरिअस गाड्यांप्रमाणेच आहे. पण आता यावर सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाणार आहे. कारण केंद्र सरकार दुचाकींवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करीत आहे. सीआआयशी झालेल्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही दर कमी होण्याचे संकेत दिले आहेत. त्या अनुषंगाने बाइक आणि मोपेडसारख्या दुचाकी वाहनांच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.
सध्या मोटारसायकल, मोपेड आणि सायकलसारख्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावला जातो. सरकारने दुचाकीवरील जीएसटीचे दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत घटवल्यास हे शक्य आहे, असे मत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले.
दुचाक्यांवरील जीएसटीसंदर्भातील या संभाव्य सुधारणेच्या वृत्ताचे भारतातील मोटार वाहन उद्योगांनी स्वागत केले आहे. मात्र, असे मानले जाते, की दुचाकींवर आकारला जाणारा कर लवकरच कमी होईल.
दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी हीरो मोटोकॉर्पनेही गेल्या वर्षी दुचाकी वाहनांच्या विक्रीवरील जीएसटी दरात घट करण्याचे आवाहन केले होते. त्याची सुरुवात १५० सीसी मोटारसायकलवरील जीएसटी १८ टक्के करून होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
वाहन समभाग वधारले
दुचाकी ही चैनीची वस्तू नाही, तसेच ती पापवस्तूही (सिन गुड्स) नाही, असे निर्मला सीतारामन यांनी बुधवारी स्पष्ट केल्यानंतर वाहन कंपन्यांचे समभाग वधारले. टीव्हीएस मोटर कंपनीचा समभाग ६.९६ टक्के, हिरो मोटोकॉर्पचा ५.१७ टक्के तर बजाज ऑटोचा समभाग ४.२२ टक्के वधारला. त्याखालोखाल टाटा मोटर्सचा समभाग ३.८९ टक्के, आयशर मोटर्सचा ३ टक्के, महिंद्र अॅण्ड महिंद्रचा २.६० टक्के आणि अशोक लेलँडचा समभाग १.३५ टक्क्यांनी वर गेला. बीएसई ऑटो इंडेक्सही १.५१ टक्के वधारता १८,२८०.८९ वर स्थिरावला
Very important knowledge to all Reader