खामगाव (गणेश भेरडे) : नगर पालिकेच्या दिव्याखाली अंधार आहे, अशी सर्वसामान्य नागरिकांची ओरड होत आहे. कारण मागील काही दिवसांपासुन गोपाळ नगर, घाटपूरी नाका परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून रात्रीच्या वेळी पथदिवे बंद राहत असल्याचा प्रकार घडत आहे. मात्र आज 2 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत गोपाळ नगर भागातील हायमास्ट सुरू असल्याचे दिसून आल्याने न.प.विद्युत विभागाचा दिव्याखाली अंधार नव्हेतर उजेडात उजेड असल्याचे उपहासाने बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार न.प.पथदिवे देखभाल दुरूस्ती तसेच सुरू व बंद करण्याचा ठेका देण्यात येतो. तर ठेकेदाराचे कर्मचारी मनमानीपणेे सध्या सायंकाळी 6 वाजता उजेड असतांनाच पथदिवे सुरू करतो तर सकाळी उजाडल्यानंतरही उशिरापर्यंत पथदिवे बंद करीत नाही. त्यामुळे पथदिवे सुरू राहतात. यामुळे न.प.ला विजबिलाचा अर्थिक भुर्दंड पडत आहे. मात्र ठेकेदाराला काही फरक पडत नाही. मागील 5-6 दिवसापूर्वी फरशी फिडरवरील घाटपूरी नाका व लगतच्या परिसरातील पथदिवे बंद होते. मात्र याबाबत न.प.विद्युत विभागाने कोणतीही दखल घेतली नव्हती. याबाबत दैनिक लोकशाही मध्ये वृत्त प्रकाशित होताच तात्काळ पथदिवे सुरू करण्यात आले होते यानंतरही रात्री अपरात्री विज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार या भागात घडत आहेत. याला महावितरण जबाबदार आहे. परंतु पथदिव्यांच्या बाबतीत नगर पालिका जबाबदार असून न.प.च्या दिव्या खाली अंधार असल्याचे बोलले जात असतांना दिवसाही हायमास्टचे दिवे झगमगाट करित आहे. यावरून न.प.च्या विद्युत विभागाचा अफलातुन कारभार दिसुन येत आहे .