नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने भारतात मोठं थैमान घातलं आहे. या व्हायरसमुळे देशभरात १६ हजाराहुन अधिक लोकांचा बळी गेला असून अनेकांना या आजाराची लागण झाली आहे. याच दरम्यान बिहारच्या पाटण्यामध्ये लग्न समारंभाला हजेरी लावणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे. कोरोनामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच लग्न समारंभाला हजेरी लावलेले तब्बल 95 वऱ्हाडीमंडळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूग्राममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाचा विवाह होता. तो लग्नासाठी आपल्या गावी आला. त्यावेळीच त्याची तब्येत ठिक नव्हती. मात्र उपचार घेण्याऐवजी धुमधडाक्यात लग्नसोहळा 5 जून रोजी पालिगंजमध्ये पार पडला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कोरोनामुळे नवरदेवाचा मृत्यू झाला. लग्नसमारंभात सहभागी झालेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुरुवातीला 15 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर इतर 80 जणांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.