मुंबई: देशासह महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून काही केल्या कमी होत नाहीय. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. यामुळे महाराष्ट्रापुढे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता कोरोना बाधितांच्या उपचारासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुर्वेदिक उपचार केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी एक आयुर्वेदिक डॉक्टरांची टास्क फोर्स तयार केली आहे. या टीममध्ये माजी महापौर शुभा राऊळ आणि इतरही आयुर्वेदिक डॉक्टरांचा समावेश असणार आहे. ही डॉक्टरांची टीम डॉ. तात्याराव लहाने यांच्या अंतर्गत काम करणार आहे.
याआधीही लीलावती हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. सुरूवातील एका रुग्णावर हा प्रयोग यशस्वीही झाला होता. पण, उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर व्हावा अशी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे.