जामनेर
सध्या खरिपाचा हंगाम चालू आहे. शेतात खाते टाकली जात आहेत. असाच शेतात खत देऊन झाल्यानंतर थकून भागून क्षीण घालवण्यासाठी आंघोळ करायला विहिरीतून पाणी काढतांना विहिरीत पडल्याने टाकळी येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. धीरज नारायण पवार (वय १८) असे या तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी तीन वाजे दरम्यान पिंपळगाव गोलाईत शिवारात ही घटना घडली.
कुटुंबाला हातभार लागावा म्हणून धीरज हा श्रीधर झावरु यांच्या शेतात खत टाकायसाठी गेला. बारावी पास झाल्यानंतर पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी विलंब होता म्हणून धीरज घराला हातभार लावत होता. खत टाकून झाल्यानंतर आंघोळीसाठी विहिरीतून पाणी काढत असताना हातातील लोखंडी कडी सटकून पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने धीरज याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे.
श्रीधर झावरू यांच्या शेतातील विहीर खोल असून त्यात जवळपास ३० फुटापेक्षा जास्त खोल पाणी आहे. धीरज हा पाण्यात बुडाल्याचे लक्षात येतात विहिरी शेजारी उभे असलेल्या सहकार्याने आरडाओरड केली. इतर लोक धावून येईपर्यंत धीरज पाण्याखाली गेला होता. तीन तासांच्या परिश्रमानंतर धीरज याचा मृतदेह करण्यात जामन्यारातील भोई बांधवांना यश आले.
याप्रकरणी तलाठी मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळावर जाऊन स्पॉट पंचनामा केला असून जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.