जळगाव : आज महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. हे चक्रीवादळ धडकण्यापूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज आयएमडी मुंबईने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर शेतात काम करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात तासी ३० ते ४० केएमपीएच वेगाने वारे वाहतील. विजांच्या कडकडाटासह २ ते ४ जून या कालावधीत मूसळधार पाऊस येण्याचा अंदाज आयएमडी, मुंबईने वर्तवलेला आहे. १जून रोजी मध्यरात्री जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याचे चित्र हाेते.
जिल्ह्यात साेमवारी मध्यरात्री वादळासह पाऊस झाला. त्यात सर्वाधिक २०.५० मि.मी. नाेंद जळगाव तालुक्यात झाली. पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ४४ अंश सेल्सियसवर गेलेले तापमान ४० अंशांवर अाले. सोमवारच्या पावसाने मुक्ताईनगर, चाळीसगाव, जामनेरात हजेरी लावली नाही. चोपडा २०.३८, एरंडोल ५,धरणगाव १०.८३, भुसावळ ०.८०, यावल २.१, भडगाव ३.३८, पारोळा ३.६०, पाचोरा ०.२९, बोदवड ०.६ मि.मी.पावसाची नाेंद करण्यात अाली.