बोदवड (प्रतिनिधी) :- कोरोना रोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी बोदवड येथे खासदार रक्षा खडसे यांनी आढावा बैठक घेतली.हजारो लोक मुंबई,पुणे व इतर शहरातून आले असून त्यांनी योग्य ती काळजी घेण्याची व आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
यावेळी तहसिलदार रविंद्र जोगी,गटविकास अधिकारी आर.ओं.वाघ,नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले,पोलीस निरीक्षक सुनिल खरे,तालुका आरोग्य अधिकारी मनोज चौधरी आदीं उपस्थित होते.
तसेचं बैठकीत पुढे रेशनिंग च्या संदर्भात चर्चा झाली.त्यात सोशल डिस्टन्स पाळून रेशन वाटप करण्यात यावे.गोरगरिबांना अन्नधान्याची अडचण होऊ नये म्हणून धान्याचे वितरण सुरळीत राहावे यासाठी पुरवठा विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात यावेळी देण्यात आल्या. एकही नागरिक रेशन धान्य मिळण्यापासून वंचित राहता कामा नये.शहरात काही विक्रेते मास्क न बांधता विक्री करत आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत अशा विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करावी.खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत.चढ्या दराने सामान विक्री होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्या अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.
पंतप्रधान मोदीनी २१ दिवस संचारबंदी जाहीर केली असून राज्य सरकार व प्रशासनास सहकार्य करून कोणीही घराबाहेर पडू नये म्हणून विनंती करण्यात आली.प्रत्येकाने काळजी घेतली तर कोरोना विषाणूला हरविणे शक्य आहे.
यामुळे शहर तथा तालुक्यात खबरदारी म्हणून प्रत्येक वार्डात व गावात औषध फवारणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सरकारच्या सूचनांचे पालन करून अफवांवर विश्वास ठेवू नका.जर कोणाला शंका असेल तर आरोग्य अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
सरकारी योजनेतील धान्य वितरण यंत्रणेतील सर्वच लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचवून एकही लाभार्थीन धान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. शिथिलते दरम्यान,विक्रेत्यांना मास्कची सक्ती करा.विक्रेत्यांनी मास्कचा वापर केल्यास वाढणाऱ्या संसर्गावर निश्चित आळा बसेल.अन्यथा संबंधित विक्रेत्यांवर प्रसंगी कारवाई करावी अश्या सुचना खा.रक्षा खडसे यांनी तहसिलदार रविंद्र जोगी यांना दिल्या.तसेच नागरिकांच्या जनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी पोस्टाकडे पाठपुरावा करण्याच्या सुचना दिल्या.
शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.यात वाढ करण्याच्या सुचना ही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच जनधन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून नागरिकांच्या खात्यात ५००-५०० रुपये जमा करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. ती गर्दी टाळण्यासाठी पोस्टमन मदत करतील ही रक्कम जनधन खातेदारापर्यंत पोहचविण्यासाठी आपण पोस्टाच्या अधिकार्यांना पत्र दिले आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने ही पोष्टाकडे पाठपुरवा केल्यास संसर्ग टाळण्यात मदत होईल असेही खा.खडसे यांनी यावेळी सांगितले. ही आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर खा.खडसे यांनी शहरातील गोरगरिब,वंचित व गरजू नागरिकांना किराणा साहित्य वाटप केले.