भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर व वर्धा दरम्यान सुरक्षा तसेच तांत्रिक कामांसाठी अप-डाऊन भुसावळ-नागपूर पॅसेंजर एक महिन्यांसाठी रद्द करण्यात आली असून भुसावळ-अमरावती पॅसेंजरही मार्च महिन्यात नऊ दिवस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, नेहमीच तांत्रिक कामांसाठी पॅसेंजर रद्द केली जात असल्याने रेल्वे प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
अप-डाऊन नागपूर पॅसेंजर महिनाभर रद्द
अप 51286 नागपूर-भुसावळ पॅसेंजर व डाऊन 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर शनिवार, 29 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान रद्द करण्यात आली आहे. शिवाय अप 51262 वर्धा-अमरावती पॅसेंजर तसेच डाऊन 51261 अमरावती-वर्धा पॅसेंजर अनुक्रमे मार्च महिन्यात 1, 7, 8, 14, 15, 21, 22, 28, 29 रोजी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.