जळगाव :अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जामनेर तालुक्यातील सांगवी येथे आज जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी भेट देऊन पाहणी केली. अतिवृष्टीमुळे चार दिवसापूर्वी सांगवी गावातील गोगडी नाल्याला मोठा पुर आला होता. दरम्यान गोगडी देवळी धरण फुटल्याची अफवा पसरल्याने गाव खाली झाले होते. हे वृत्त कळताच रात्री पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या पुरामुळे नाल्याच्या काठावरील शेतीचे मोठे नुकसान झालेआहे. याची पाहणी करण्याकरीता आज जिल्हाधिकारी डाॅ ढाकणे यांनी सांगवी गावास भेट दिली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच झालेल्या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश महसुल विभागास दिले. तसेच पंचनामे करताना पीकांच्या नुकसानी बरोबरच विहीर, पाईपलाईनचेही नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. व या नुकसानीचेही पंचनामे करण्याची मागणी केली. यावेळी जामनेरचे तहसीलदार, पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सांगवीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.