
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या अमृत २.० योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा गंभीर आरोप युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी केला आहे. या योजनेचे काम खासगी कंत्राटदारामार्फत करण्यात येत असून त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (मजीप्रा) आहे. मात्र संबंधित यंत्रणा व कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.
याबाबत विक्रांत सहारे यांनी वर्ष २०२५ मध्ये मनपा आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे लेखी निवेदन देऊन निकृष्ट कामांची तक्रार केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सहारे यांनी पुन्हा स्मरणपत्र देत पाठपुरावा सुरू ठेवला.
सततच्या पाठपुराव्यानंतर मनपा आयुक्त आकनुरी नरेश यांनी संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून स्पॉट पंचनामा केला. यावेळी त्यांनी कंत्राटदाराची चांगलीच कानउघाडणी करत दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकारावर कोणतीही भूमिका न घेतल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
कंत्राटदार आणि मजीप्रा अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा संशयही आता व्यक्त केला जात आहे. मनपा आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही निकृष्ट दर्जाचे काम सुरूच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर विक्रांत सहारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूरचे मुख्य अभियंता यांच्याकडे निवेदन सादर करून चंद्रपूरातील निकृष्ट कामांना जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावर उपमुख्यमंत्री कार्यालय, डॉ. के. एच. गोविंद राज, अप्पर मुख्य सचिव नगरविकास मंत्रालय तसेच मुख्य अभियंता मजीप्रा यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा सहारे यांनी केला आहे. येत्या पंधरा दिवसांत संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई न झाल्यास युवासेनेच्या वतीने “शिवसेना स्टाईल” तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. सदर निवेदन देताना संदीप रियाल पटेल (युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक) तसेच संजय ठाकूर (राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष, चंद्रपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

